पुन्हा निरक्षर होता आलं असतं
तर बरं झालं असतं...
मुळाक्षरांच्या बुबुळात बुबुळे घालून
संवेदना हरवून गेल्यात जगण्याच्या...
डोळ्यांना दिसते आहे म्हणून फ़क्त...?
मेंदूचं काम थंडच... कित्येक दिवस.
वृत्तपत्रे अन माध्यमांच्या
आवाजाला म्हणतो आहे
माझा आवाज...माझं ज्ञान
या मुळाक्षरांनी दाखवली खरी
डोंगरापलीकडची घळ.
पण ओळी ओळीतून
मला बसवलच
काचेच्या घरात...
वाचून वाचून डोळे आगावले
नि लिहून लिहून बोटे निर्जिव...
पण ना टाळी लागली कुठे...
ना दंगलीत फेकला गेलो आपोआप...
घृणेची थूंकी टाकत राहिलो
आपली कमी पडू नये म्हणून.
आता बाहेर पडलो तरी
असेलंच सोबत
या अक्षरांची सावली त्यांचे डाग...
व्यक्त होण्याच्या निलाजस सवयी
खरच पुन्हा निरक्षर होता आलं असतं तर...?