तेव्हा अख्खी वहीच असायची डोक्यात कवितांची
एका ओळीत गर्दी करून असायचे शब्द श्वासांसोबत
उभा जन्म भरून पावायाचा
शब्दांतून रितं होत जाताना
नि वाटायचं सगळ्या जगाला आपण देत आहोत मंत्र
सुखी होण्याचा
तेव्हा रोज व्हायचीच
सकाळ दुपार संध्याकाळ रात्र
तेव्हा असायचे
उन वारा पाउस थंडी
तेव्हा दिसायचे रंग
काळे-पांढरे गडद-फिके
तेव्हा कळायचे नाहीत कशाचेच नेमके अर्थ
तेव्हा किती सहज व्हायचे अर्थाचे अनर्थ
पण तेव्हा वाटायचं नाही काहीच व्यर्थ
आत्तासारखं